भीमाशंकरचे अरण्यवाचन!

 वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाबरोबर निसर्गाच्या प्रत्येक घटकांवरचे अतिक्रमणही वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो आमच्या निसर्गदत्त जंगलांना! यातून वनस्पती, पशू-पक्षी आणि एकूण जंगल ही परिसंस्था धोक्यात येऊ लागल्यानेच सरकारतर्फे अशा वनांना संरक्षण देत ती ‘संरक्षित क्षेत्रे’ म्हणून जाहीर करावी लागली. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान किंवा व्याघ्रप्रकल्प अशा नावाखाली सुरक्षित झालेली अशी अरण्ये आज राज्यभरात चाळीमधून अधिक आहेत. यात पुण्याजवळच्या भीमाशकंर अभयारण्याचा क्रमांक खूप वरचा आहे.
 श्री क्षेत्र भीमाशंकरमुळे हे स्थान तसे जनसामान्यांच्या परिचयाचे. परंतु या तीर्थक्षेत्राच्या भोवतीने जे घनदाट जंगल वसलेले आहे, तिकडे अभ्यासक किंवा डोंगरभटके वगळले तर altफारसे कोणी वळत नाही. उन्हाळा हा किती रुक्ष आणि रखरखीत असा ऋतू वाटला तरी जंगलवाचनासाठी, त्यातले बदल टिपण्यासाठी हा ऋतू सर्वात चांगला मानला जातो. तेव्हा याच काळात भीमाशंकर नाहीतर अन्य कुठल्याही जंगलवाटेकडे एकदा वाट वाकडी करावी.
भीमाशंकरला यायचे असेल तर पुणे-नाशिक महामार्गावरील पुणे जिल्ह्य़ातील मंचर किंवा राजगुरुनगर या दोन ठिकाणाहून मार्ग आहेत. या दोन्ही गावांपासून हे अंतर साधारण सत्तर किलोमीटरचे! भीमाशंकरचे पर्यटन महत्त्व ओळखून एमटीडीसी आणि वनखात्याने इथे आपली विश्रामगृहे यापूर्वीच थाटली आहेत. याशिवाय काही खासगी हॉटेल किंवा घरगुती स्वरूपाचीही राहण्या-जेवणाची सोय होते. हा झाला सोयी सुविधांचा मामला. पण पाठीवर सॅक घेत डोंगरवाटा तुडवणाऱ्यांसाठी ही सारी भूमीच सुजलाम सुफलाम अशी आहे.
भरपूर पाऊस आणि अनुकूल स्थिती यामुळे आमची बहुतेक जंगले ही घाटमाथ्याच्या आश्रयाने वाढलेली दिसतात. भीमाशंकर जंगलही असेच घाटमाथ्यावर वसलेले. भीमा आणि घोड नद्यांचा उगम आणि भीमाशंकर सारख्या तीर्थक्षेत्रामुळे या जंगलाचे प्राचीन काळापासूनच ‘देवराई’ म्हणून जतन होतच होते. इथे राहणाऱ्या आदिवासींनी त्यांचे हे घर राखले-वाढवले. इथल्या वनसंपदेचे महत्त्व लक्षात घेऊन, सर्वप्रथम ब्रिटिशांनी १९२७ मध्ये या जंगलाची ‘रिप्रेझेंटिटिव्ह फॉरेस्ट’ म्हणून नोंद घेतली. पण पुढे स्वातंत्र्यानंतर इथे जंगलतोड आणि शिकार वाढल्याने १० ऑक्टोबर १९८५ रोजी महाराष्ट्र शासनाने हा १३० चौरस किलोमीटरचा सदाहरित जंगलाचा प्रदेश ‘अभयारण्य’ म्हणून घोषित केला.
पुणे जिल्ह्य़ातील एकमेव अभयारण्य असलेल्या या जंगलाचा विस्तार लोणावळ्याच्या उत्तरेस राजमाची किल्ल्यापासून ते थेट आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील आहुपे खोऱ्यापर्यंत आहे. पुण्याबरोबरच रायगड आणि ठाणे जिल्ह्य़ातील जंगलाचा भागही याला जोडलेला आहे. दरवर्षी पडणारा साधारण तीन हजार मिलिमीटर पाऊस आणि घाटमाथ्याचा आश्रम यामुळे इथली हिरवाई वर्षांमागे अधिकाधिक घट्ट झालेली आहे. नानाविध वनस्पती आणि तेवढेच पशू-पक्षी हे या अरण्याचे वैशिष्टय़ आहे. अगदी झाडांचे पाहू लागलो तर, जांभूळ, हिरडा, बेहडा, पिसा, अंजन, उंबर, वड, पिंपळ, आंबा, चिंच, लोथ, गेळा, पांगारा, पळस, शेंद्री, साग आणि अशीच कितीतरी झाडे. या झाडांच्याच जोडीला करवंद, कारवी, लोखंडी, लोहारी, रामेठा अशी असंख्य झुडपेही आणि पुन्हा नाना तऱ्हेच्या वेली हे या वनराईचे वैशिष्टय़. वसंतात यातील बहुतेक झाडांना बहर येतो, तर वर्षां ऋतूत सोनकी, तेरडा सारख्या हजारो रानफुलांच्या पायघडय़ा साऱ्या जंगलभर उमटतात.
जी गोष्ट झाडांची तीच इथे वावरणाऱ्या पशू-पक्ष्यांची! आश्रयासाठी घनदाट अरण्य, पाण्यासाठी ठरावीक अंतरावरील झरे-ओढे आणि मुख्य म्हणजे एक समतोल वन्यजीवांची साखळी यामुळे अनेक पशू-पक्ष्यांचे भीमाशंकर एक हक्काचे घर बनले आहे. बिबटय़ा, रानडुक्कर, कोल्हे, साळिंदर, रानमांजर, सांबर, तरस, मुंगुस, भेकर, ससे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविध जाती इथे आढळतात. पक्ष्यांमध्येही अनेक दुर्मिळ जातींचे दर्शन इथे घडते.
१९८९ च्या प्राणिगणनेत या अभयारण्यात आठ बिबटे आढळले होते. आज ही संख्या ३० च्या वर गेली आहे. चापडा (बाम्बू पिट व्हायपर) ही विषारी सापाची जात इथेच या जंगलात आढळते. पण या साऱ्यात या जंगलाचे महत्त्व याहून निराळे! अवघ्या भारतात वैशिष्टय़पूर्ण समजली जाणारी शेकरू (जायंट स्क्विरल) ही महाखार या जंगलात मुक्कामाला असते. खरेतर तिच्या या अधिवासालाच संरक्षण देण्यासाठी या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कळसूबाई-हरिश्चंद्रगड आणि भीमाशंकरच्या जंगलातच आढळणारी ही खार तब्बल साडेतीन फूट लांबीची. पाठीवर तांबूस तर तोंड व शेपटीकडे पांढऱ्या रंगाच्या असणाऱ्या या भल्यामोठय़ा खारीस महाखार किंवा भीमाशंकरी असेही म्हणतात. अतिशय चपळ असणारी ही खार कायम झाडावर राहते. ठरावीक जागीच घरटे करते. लोभस रूप आणि आकर्षक रंगछटा असणाऱ्या या दुर्मिळ शेकरूला आमच्या राज्याच्या मानचिन्हाचा दर्जा मिळाला आहे. भीमाशंकरच्या जंगलात फिरताना ही शेकरू पाहणे हेच मुख्य आकर्षण राहते.
भीमाशंकरच्या या अभयारण्याचे आणि त्यातील शेकरू खारीचे दर्शन घ्यायचे असेल तर मात्र त्याची मुख्य रस्त्याची वाट सोडून थोडे जंगलात शिरावे लागते. या जंगलात फिरण्यासाठी काही पायवाटा आहेत. अरण्यातील काही गावांसाठी ये-जा करण्याच्या घाटवाटाही आहेत. याशिवाय लोणावळा, कर्जत आणि राजगुरुनगर जवळील भोरगिरीहून या भीमाशंकरच्या दिशेने डोंगरभटक्यांच्या काही ट्रेकच्या वाटाही धावतात. राजमाची, ढाकचा बाहेरी, कोथळीगड, पदरचा किल्ला, सिद्धगड असे गडकोट ही या अरण्याच्या हद्दीत येतात. या सर्व वाटांवरून फिरू लागलो की भीमाशंकरचे हे अरण्यवाचन सहज होते. दोन झाडांच्या एकत्र आलेल्या फांद्यावरून धावणारी एखादी शेकरू नजरेस पडते. कुठेतरी एखाद्या तळ्याकाठी बिबटय़ाच्या पायाचे ठसे डोळू चमकून जातात. छोटय़ाशा झुडुपांना जोडत धागे विणणारा एखादा सिग्नेचर स्पायडरही लक्ष वेधून घेतो. पळस, सावरीचा बहर आणि जांभूळ-आंब्यांचा मोहर त्यावरची पक्ष्यांची धावपळ दाखवत नजरेचा गोंधळ उडवून टाकतो.
कुठल्याही जंगलातील भ्रमंती आणि सामान्य पर्यटन यात फरक आहे. इथले पर्यटन हे निसर्गाशी एकरूप होत, त्याच्याशी मैत्र साधतच तुम्हाला करावे लागते. यामध्येही शांतता आणि निरीक्षणाला खूप महत्त्व असते. पण हे सारे सोडत जंगलातील पाणी खराब करणे, वृक्ष तोडणे, आग लावणे, गाणी वाजवणे, आरडाओरडा- गोंधळ घालणे, फटाके वाजवणे यामध्येच काही मंडळी रमतात. कायद्याला आणि मुख्य म्हणजे इथल्या पशू-पक्ष्यांना या अशा गोष्टी आवडत नाहीत. मग यातून कधीतरी जीवावर बेतले जाते.
खरेतर कुठलेही जंगल फक्त पाहायचे, अनुभवायचे, वाचायचे असते. सांबराने झाडाला घासलेली शिंगे, बिबटय़ाने ओरखडे ओढत नखांना लावलेली धार, अस्वलाने उकरलेली वारुळे, प्राण्यांचे बदलणारे आवाज, पक्ष्यांचे एकमेकांना साद घालणे, वनस्पतींचे बहर, पशू-पक्ष्यांबरोबरचे त्यांचे सहजीवन हे सारे-सारे खूप वेगळे जग असते. हे अनुभव घेण्यात एक मजा असते. जंगलची ही एक भाषा असते. ती थोडीफार जरी आत्मसात केली तरी मग असे हे अरण्यवाचन खूप मजेशीर आणि रंजक होत जाते.


-अभिजित बेल्हेकर ,लोकसत्ता
abhijit.belhekar@expressindia.com

(http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=213319:2012-02-28-17-11-38&catid=362:trek-&Itemid=365)

राहिले रे दूर घर माझे!


 वन्यजीव क्षेत्रात वन्यजीव पशुवैद्यक म्हणून काम करताना नेहमीच भावस्पर्शी अनुभवांना सामोरं जावं लागतं. हे अनुभवसंपन्न जीवन जगत असताना जीवनाच्या जडणघडणीचा प्रवास अधिकच रंजक होत जातो. एखादा वन्यजीव जखमी झाल्याची बातमी कळल्यावर होणारी मनाची घालमेल, मग ज्या ठिकाणी तो जीव जखमी झालेला असेल तिथपर्यंत पोहोचेपर्यंत मनात होणारी चलबिचल, त्या जखमी जीवाला पकडण्यासाठी खंबीर करावं लागणारं मन आणि मग त्या जीवाला पकडल्यानंतर चेहऱ्यावर आणि मनावर उडणारे आनंदाचे तुषार, या सगळ्या मानसिक बदलांना सामोरं जाताना माझं भावविश्व आपोआपच खुलत जातं. बरं, प्राण्याला पकडल्यानंतरही हा मानसिक प्रवास इथंच संपत नाही. त्यानंतर त्याच्यावर उपचार करताना त्याच्याशी भावनिक नातं जुळतं न जुळतं तोच त्याला परत त्याच्या नसíगक अधिवासात सोडायची तयारी सुरू होते. मग त्या जखमी जीवाच्या मनात डोकावून बघितल्यावर कधी आपल्या कुटुंबीयांना भेटायची त्याची ओढ दिसून येते, तर कधी त्याला असह्य़ होणाऱ्या वेदना मनाला जखमी करून जातात. मग एवढी मानसिक स्थित्यंतरं झाल्यानंतर तो जीव त्याच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचला तर जीवन सार्थकी लागल्याचं समाधान ओसंडून वाहायला लागतं, तर कधी दुर्दैवानं तो जीव मृत्युमुखी पडला तर नैराश्याचं सुतक बरेच दिवस मनाला कुरतडत राहतं, पण निसर्गचक्राच्या ‘द शो मस्ट गो ऑन’ या नियमानुसार पुन्हा कामाला लागतो आणि नवीन पाहुण्याच्या स्वागताला पुन्हा सज्ज होतो.
‘सोसायटी फॉर वाईल्ड लाईफ कॉन्सव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अँड रिसर्च’ या निसर्गसंस्थेच्या वतीनं आम्ही नागपूर शहरात वन्यजीवांसाठी खास बचावपथक तयार केलं आहे. नागपूर शहरात किंवा शहरालगत कुठंही जखमी पशुपक्षी सापडला तर त्याला वाचवणं, त्याच्यावर उपचार करणं आणि त्याला पुन्हा त्याच्या नसíगक अधिवासात परत सोडणं, ही आमची जबाबदारी असते. या बचाव पथकाच्या सदस्यांनी एकदा एक जखमी माकडाचं पिल्लू पकडून उपचार करण्यासाठी आणलं होतं. त्या पिल्लाबाबत अधिक माहिती कळली तेव्हा काहीसा चिंतातुर झालो, कारण त्या माकडाच्या पिल्लाच्या आईचा मृत्यू झालेला होता. मांज्यामुळे की अन्य कुठल्या तरी कारणानं जखमी झाल्यानं माकडीण आणि तिचं पिल्लू कळपापासून वेगळी पडली होती. त्यानंतर दोन दिवस जखमी अवस्थेत जीवन-मरणाची लढाई झुंजत झुंजत त्या माकडिणीचा मृत्यू झाला होता. आईचा मृत्यू सहजपणे स्वीकारायला तयार नसलेलं पिल्लू आईच्या छातीला चिकटून होतं. ते पिल्लू अनाथ झालं असल्याचा विचार मनात येताच मलाच पोरकं वाटायला लागलं.
त्याची आई मेली असली तरी कळपातील वयात आलेल्या इतर माद्या त्या पिल्लाचा सांभाळ करतील, असा विश्वास होता. त्याला घरी आणल्यानंतर प्रथमोपचार सुरू केले; ते पिल्लू जखमी होतं म्हणून नाही, तर आईच्या मृत्यूमुळे झालेल्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी, पण फार काही खटाटोप करावा लागली नाही, कारण लवकरच त्या पिल्लाचं खाणंपिणं नॉर्मल झालं आणि ते अगदी सहजपणे घरात खेळायला लागलं होतं. त्याचं बरं होणं मनाला आनंद देत होतं, पण त्याला कळपात परत सोडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीच्या विचारानं मनात विचारांचं वादळ घोंगायला सुरुवात झाली होती. पिल्लाला त्याच्या कुटुंबीयांसोबत परत भेटवण्यासाठी काय ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ असायला हवा, याची तयारी सुरू केली. पिल्लू बऱ्यापकी मोठं म्हणजे साधारणपणे ८ ते १० महिन्यांचं होतं त्यामुळे ते सुखरूप राहील, असा मनाला दिलासा होता, पण त्याची आई मेलेली असल्याचं माहीत असल्यामुळे त्याला कळपातील इतर माकडं स्वीकारतील की नाही, स्वीकारलं तरी त्याला नेहमीसारखंच जीवन जगता येईल की नाही, कळपातली इतर माकडं त्याला डॉमिनेट करून त्रास तर देणार नाही ना, असे नाना प्रकारचे प्रश्न डोक्यात येत होते आणि त्याला कळपात परत सोडण्याच्या माझ्या स्वप्नांवर पाणी फिरत असल्यासारखं वाटत होतं.
पण त्या पिल्लाच्या डोळ्यात बघितलं की, ते अगदी निरागस भावनेनं ‘मला माझ्या कळपात परत जायचं आहे’ असं सांगत असल्यासारखं वाटायचं. जणू ते पिल्लू डोळ्यांनी ‘राहिले रे दूर घर माझे’ असं काहीतरी सांगत असल्यासारखं वाटायचं. माकडांच्या आणि इतर वन्यप्राण्यांच्या निरीक्षणातून एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली आहे ती ही की, इतर कुठल्याही प्राण्यांच्या तुलनेत वन्यप्राण्यांमध्ये जिवंत राहण्याचा आणि त्यासाठी प्रयत्न करत राहण्याचा ‘बेसिक इंस्टिंक्ट’ खूप जागृत असतो. मृत्यू जवळपास भटकायला जरी लागला तरी त्याला जोमानं दूर झुगारून जिवंत राहण्याचा प्रयत्न सगळेच वन्यजीव करतात. काही वेळा ते त्यात अपयशी होत असले तरी बरेचदा ही लढाई जिंकतातही त्यामुळेच की काय, मलादेखील हे पिल्लू कळपात स्वीकारलं जाईल आणि उर्वरित आयुष्य सुरळीतपणे जगेल, असा विश्वास होता. याशिवाय, हे जखमी पिल्लू एक मादी होती. त्यामुळेही कळपाचा नायक आणि कळपातले इतर सदस्य या पिल्लाचा सहज स्वीकार करतील, असा आशेचा किरण दिसत होता. त्याऐवजी हे पिल्लू नर  असते तर कळपातल्या इतर सदस्यांनी त्याला कळपाचा भविष्यातला दावेदार म्हणून नक्कीच त्रास दिला असता.
ठरलं, पिल्लाला लवकरच कळपात परत सोडायचं. त्यासाठी त्या कळपाचा शोध सुरू झाला. सलग दोन तीन दिवस कळपाचा माग काढल्यावर कस्तुरचंद पार्कजवळील झाडांच्या गर्दीत तो कळप आढळून आल्याचं कळलं. ही बातमी कळताच पिल्लाला िपजऱ्यात ठेवून कळप शोधून काढला. कळपापर्यंत पोहोचल्यावर एक कृती आराखडा तयार केला. कळपातल्या इतर सदस्यांनी पिल्लाचा स्वीकार न करता त्याच्यावर हल्ला केला तर काय करायचं, लोकांनी गर्दी करून कामात अडथळा आणायला सुरुवात केली तर काय करायचं, पिल्लू अगदी भलत्याच दिशेला पळायला लागलं तर काय करायचं, अशा सगळ्या शक्यता गृहीत धरून कामाला सुरुवात केली. पिल्लाला झाडाखाली नेताच कळपातल्या लहान पिल्लांनी एकच गलबला केला. बहुधा त्यांनी आपल्या मैत्रिणीला ओळखलं असावं. पिल्लाला जेव्हा सोडलं तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिनं झाडाकडे धूम ठोकली. डोळ्याची पापणी मिटण्यापूर्वीच ते पिल्लू झाडाच्या टोकावर उंच जाऊन बसलं. थोडय़ाच वेळात कळपातली लहान माकडं तिच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी तिचे जोरदार स्वागत केले. थोडय़ावेळानं त्यांचं एकमेकांचे पाय ओढणं, एकमेकांच्या मागं लागणं, शेपटय़ा ओढणं, असे खेळ सुरू झाले. कळपातल्या इतर माद्या बहुतेक तिच्या परत येण्यावर नाराज होत्या. चार पाच माद्यांपकी एकीनं पिल्लाला जाणूनबुजून त्रास द्यायला सुरुवात केली. कधी पिल्लाचे पाय ओढून तर कधी शेपटी ओढून ती त्या पिल्लाला जवळ ओढू पहात होती. काही वेळानं ते पिल्लू अगदी लहान फांदीच्या टोकावर जाऊन बसून राहिलं.
तिथपर्यंत पोहोचता येत नसल्यानं त्या मोठय़ा मादीनं पिल्लाचा नाद सोडला. पिल्लूदेखील लगेच नॉर्मल झालं. चिंचेच्या झाडावर बसून ते झाडाचा कोवळा पाला खायला लागलं. त्याच्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज नॉर्मल होत्या. ते बघून मला खूप बरं वाटलं, पण तरीही पिल्लाची आई जिवंत नसल्याचं माहीत असल्यामुळे अस्वस्थच होतो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. कळपातली सगळी माकडं झाडावर वेगवेगळ्या फांद्यांवर जाऊन बसली. त्यांची झोपायची तयारी सुरू होती. थोडय़ाच वेळात सगळीकडे काळोख दाटून आला. कळपातली सगळी माकडं झोपी गेली. सोडलेलं माकडाचं पिल्लूदेखील आरामात पहुडलं होतं.
पिल्लू कळपात परतलं होतं, कळपानं तिचा स्वीकारही केला होता, तिला तिचं घर परत मिळालं होतं, पण माझ्या मते तिचं ‘खरं’ घर दूरच राहिलं होतं.


-डॉ. बहार बाविस्कर, लोकसत्ता
९९७५६८०३७५

Related Posts Plugin for WordPress, Blogger...